IndiaPoliticalUpdate : “तुमसे नाराज नही , मोदीजी , हैराण हूँ मै …” खा. सुप्रिया सुळे यांचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानण्याच्या प्रस्तावावर भाषण करताना काँग्रेस आणि महाराष्ट्रावर देशात कोरोना पसरवल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर मी नाराज नाही तर हैराण आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना सुपर स्प्रेडर असल्याचे कसे म्हणालात. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आरोप केला असता तरी मी तो कबुल केला असता. मी महाराष्ट्राची मुलगी म्हणून पंतप्रधानांकडे न्याय मागत आहे,” अशा शब्दात निशाणा साधला.
मोदींच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि , “कोण कोविड सुपर स्पेडर आहे याचे प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे. लॉकडाउनच्या आधी लोकसभेचे कामकाज सुरु होते. त्यावेळी तृणमूलचे खासदार सौगता रॉय संसद सुरू असताना स्वतः पंतप्रधानांकडे चालत गेले आणि कोविड पसरत असल्याने कामकाज लवकर संपवले पाहिजे असे सगळ्यांचे मत आहे, असे म्हटले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी काय करायचे ते नंतर बघू असे म्हणाले. कारण मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यात हे सगळे व्यस्त होते.” याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरवणे धक्कादायक
“पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. परंतु पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या. राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे,” असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
देशाच्या मा. प्रधानमंत्र्यांनी काल लोकसभेत एक तासाचे भाषण केले. यामध्ये त्यांनी कोरोना, रोजगार, महागाई अशा विविध विषयांवर देशाला एक दिशा द्यावी अशी अपेक्षा होती. दुर्दैव की प्रधानमंत्री आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलले. ही दुःख देणारी गोष्ट आहे. – खा. @supriya_sule
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 8, 2022
खरे तर एका पक्षाच्यावतीने पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दुखः झाले. पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही. ते पद पक्षाचे नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान गुजरात राज्यामधून १०३३, महाराष्ट्रातून ८१७ आणि पंजाबमधून ४०० ट्रेन करोनाकाळात चालवण्यात आल्या. ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्र सरकार चालवते. आमच्याकडे ट्रेन नाही आम्ही एसटी देऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वेदना होत आहेत. मी कुठल्या राज्याचा प्रचार करत नाही आहे. मला देशातल्या प्रत्येक राज्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. रेल्वे मंत्री असताना पीयूष गोयल यांचे मी अनेकवेळा आभार मानले आहेत. पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्यासाठी तयार असल्याचे ट्विट केले होते. पीयूष गोयल महाराष्ट्राला मदत करु पाहत होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.