शेतकरी आंदोलनाला शाह देण्यासाठी तिकरी सीमेवर ठोकण्यात आले खिळे !!
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. दरम्यान तिकरी सीमेवर उभारण्यात आलेले खिळे, भिंती यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “एवढे मोठे खिळे चीनच्या सीमेवर लावले असते तर चिनी सैन्य २० किमी आत घुसले नसते ”. अधिवेशनाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “अधिवेशनातील लढाई अधिवेशनात, ही रस्त्यावरी लढाई आहे”.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपण आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यानुसार ते गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. दरम्यान तिकरी बॉर्डवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत. तसंच बॅरिकेट्सची भिंतच उभारली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलले की, “शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना पाठबळ देणे आपले कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहोत”. “देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करण कर्तव्य आहे,” असेही राऊत म्हणाले. “राकेश टिकैत आणि आम्ही आधी दूरध्वनीवरुन बोललो होतो. पण फोनवरुन बोलणे आणि प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणे हे महत्वाचे आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.