#FarmersProtest : “कानून वापसी नही तो घर वापसी नही ” राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा
किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही’ असा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असे विधान केले असल्याने सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. “हे आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही. हे आंदोलन लवकर संपणार नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर येथे भेट घेतल्यानंत राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. संजय राऊत यांच्या भेटीसंबंधी बोलताना राकेश टिकैत यांनी सांगितले की, “जर विरोधक येऊन आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यामध्ये काहीच समस्या नाही. पण त्यांनी याचे राजकारण करु नये. जर कोणी नेते भेटायला येत असतील तर आम्ही काहीच करु शकत नाही”.
६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’
मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. आता भारतीय किसान युनियनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचे राकेश टिकैत यांनी जाहीर केलेअसून दुसरीकडे शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणादेखील केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनासंबंधी एक मोठी घोषणा केली आहे.