CoronaMaharashtraUpdate : नवीन रुग्ण १६ हजार ४२९ , ४२३ रुग्णांचा मृत्यू , अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आता २ लाख ३६ हजार ९३४
गेल्या २४ तासात राज्यात आज ४२३ करोनामृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेपुढे मृत्यूदर नियंत्रणात आणण्याचे खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील करोनाबळींचा एकूण आकडा आता २७ हजारचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. उपराजधानी नागपूरसाठी चिंता वाढवणारी बातमी असून नागपुरात नागपूरमध्ये दिवसभरात १४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान राज्यात रविवारच्या तुलनेत नवीन बाधित रुग्णांचा आकडा आज कमी झाला आहे. काल रविवारी राज्यात तब्बल २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली होती तर आज हा आकडा १६ हजार ४२९ इतका खाली आला आहे. राज्यातील उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या (अॅक्टिव्ह रुग्ण ) आता २ लाख ३६ हजार ९३४ इतकी असून एकूण रुग्णसंख्या ९ लाख २३ हजार ६४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ लाख ५ हजार ९३२ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातून ९,२३,६४१ इतक्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे प्रमाण एकूण चाचण्यांच्या १९.६३ टक्के इतके आहे. राज्यात आज आणखी १४ हजार ९२२ रग्ण करोनावर मात करून घरी परतले. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा एकूण आकडा आता ६ लाख ५९ हजार ३२२ इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७१.३८ टक्के इतके आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत ४२३ रुग्ण दगावले असून सध्या मृत्यूदर २.९३ इतका झाला आहे. आतापर्यंत एकूण २७ हजार २७ रुग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले आहे. एकट्या नागपूर महानगर पालिकेच्या हद्दीत आज १४९ मृत्यूंची नोंद झाल्याने सगळेच हादरले आहेत. राज्यात सध्या पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आजचा आकडा ६१ हजार ७८१ इतका असून आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण २ लाख ३४ हजार ६८ लोकांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत एकूण रुग्णसंख्या १ लाख ५७ हजार ४१० इतकी झाली असून सध्या २४ हजार १५० रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत तर ठाणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २५ हजार ७०३ इतका असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ४४ हजार ९०० झाली आहे.