#CoronaVirusUpdate : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २४ हजारावर , जाणून घ्या आपल्या जिल्ह्याची स्थिती….
आज दिवसभरात १०२६ रुग्णांची भर पडल्याने राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. दरम्यान आजच्या एकाच दिवशी ३३९ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज राज्यात ५३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या आता ९२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील २८, पुण्यातील ६, पनवेलमधील ६, जळगावमधील ५, सोलापूर शहरातील ३, ठाण्यातील २, रायगडमधील १, औरंगाबाद शहरातील १ आणि अकोला शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. ५३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.