#CoronaVirusUpdate : औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 545 वर तर बळींची संख्या 13 वर

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज सकाळी 508 वरून 37 रुग्णांची भर पडल्याने 546 झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील 50 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान आज सकाळी 7.50 मिनिटांनी मृत्यू झाल्याचे औषधवैद्यक शास्त्राच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 3 मे रोजी सकाळी चार वाजता पुढील उपचारासाठी घाटीत त्यांना संदर्भीत केले होते. मधुमेह, किडनीचा आजारही त्यांना होता. मूत्रपिंडाचे काम कमी झाल्याने त्यांचे चार वेळा डायलिसिस केले. त्यांना श्वासोश्वासास त्रास होत असल्याने सहा मे रोजी रात्री आठ वाजता कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर लावले. मागील दोन दिवसांपासून रक्तदाब कमी झाल्याने व न्युमोनिआ व मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कळवले आहे.
कोविडबाधित 545 रुग्ण
औरंगाबाद शहरातील विविध भागातील 37 रुग्णांची आज नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडबाधितांची संख्या 545 झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 22 पुरूष, 15 महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये (कंसात रुग्ण संख्या) राम नगर (19), सिल्क मिल कॉलनी (08), रोहिदास नगर (02), वसुंधरा कॉलनी, एन-7, सिडको (01), चंपा चौक (05), दत्त नगर (01), संजय नगर (01) या परिसराचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील 65 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आजच्या 50 वर्षीय कोविडबाधित पुरूष रुग्णांसह 13 जणांचा मृत्यू झाल्याचे मिनी घाटीच्यावतीने सांगण्यात आले आहे.