BeedNewsUpdate : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन देशमुख कुटुंबीयांनी घेतली महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यश मागणी होत असल्याचे पाहून भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याच वक्तव्य काल केले होते. आहे. नामदेव शास्त्री महाराज यांच्या या वक्तव्यावरून बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे . या पार्श्वभूमीवर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबीय भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली आणि या प्रकरणातील सर्व पुरावे दाखवत त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत, त्यांची खरी मानसिकता तपासण्याची गरज असल्याचे धनंजय देशमुख नामदेव शास्त्री यांना म्हणाले. आरोपी ज्या लोकांच्या गाडीत बसत होते, त्या लोकांनी जर त्यांची मानसिकता तपासली असती तर अशा घटना घडल्या नसत्या असे धनंजय देशमुख म्हणाले. या आरोपींवर 40 ते 50 गंभीर गुन्हे असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. देशमुख कुटुंबीयांनी कधीही जातीवाद केला नाही. मस्साजोगला 19 पुरस्कार मिळाले आहेत. 15 वर्ष संतोष देशमुखांनी चांगले काम केल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न माझ्या भावाने केला होता असेही धनंजय देशमुख म्हणाले. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींचे पुरावे यावेळी धनंजय देशमुख यांनी नामदेव शात्री यांना देखील दिले.
शास्त्रींनी घेतला यूटर्न….
देशमुख यांनी चापट मारल्यानंतर गुन्हेगारांनी पुढील कृत्य केले, त्यांचीही मानसिकता समजून घ्यायला हवी, असे वादग्रस्त वक्तव्य भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यांच्या विधानावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांनी रविवारी एक पाऊल मागे घेतले. देशमुख कुटुंबियांच्या भेटीत आपण आरोपींची बाजू घेत नसल्याचे महंत शास्त्री म्हणाले.
नामदेव शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आरोपींविरोधात असलेले पुरावे घेऊन देशमुख कुटुंबियांनी भगवानगडाला भेट दिली. आपल्यावर ओढावलेली आपबीती सांगताना वैभवीला रडू कोसळले. तुम्ही आरोपींची कड घ्यायला नको होती, असे वैभवी स्पष्टपणे शास्त्रींना म्हणाली. त्यावर माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे म्हणत शास्त्रींनी यूटर्न घेतला.
गेल्या 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी माणूस होते. त्यांना चार मुले आहेत. त्यांची 3 मुले आमची शेती करतात. एक मुलगा पुण्यात आहे. आत्तापर्यंत म्हणजे 2003 पासून त्यांनी जे पिकवलं तेच आम्ही खात आहे. संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून शेतात कामगार असणाऱ्या मुंडेचे चार किलो वजन कमी झाल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. त्याच्यासोबत म्हणजे वंजारी समाजासोबत आमची दुसरी पिढी आहे. आम्ही कधीही जातीवाद केला नसल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
नामदेव शास्त्री यांचे निवेदन
धनंजय देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना भगवानगड कधीही पाठिशी घालणार नाही. भगवानगड हा कायमस्वरुपी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहिल असेही नामदेव शात्री म्हणाले.
दरम्यान धनंजय देशमुख हे नामदेव शास्त्री यांच्यासोबत बोलत आहेत. आमच्या कुटुंबीयांचा कधीच कोणता वाद झाला नाही. माझ्या भावाला अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने कॉल केला होता. या दलित बांधवांची ॲट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता असेही धनंजय देशमुख म्हणाले.
काय म्हणाले होते नामदेव शास्त्री?
धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाब असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. मुंडेंनी भगवान गडावर मुक्काम केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर नामदेव शास्त्री बोलले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की, धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे. धनंजय मुंडे यांना जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यानंतर आज देशमुख कुटुंबीयांनी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेत नामदेव शास्त्रींची भेट घेतली.
आरोपींची पाठराखण करणारे जातीयवाद करतात ना… : वैभवी म्हणाली
ज्यांना कुणाला आरोपीचं समर्थन करायचंय त्यांनी निश्चित करा, आम्ही त्यांच्याबाबत काही बोलत नाही, बोलणार नाही. पण न्याय मागणारे जातीयवादी कसे असतील? आरोपींची पाठराखण करणारे जातीयवाद करतात ना… माझ्या वडिलांनी कधीही जातीयवाद केला नाही, असे सांगत आमची शेती कसणारेही मुंडे आडनावाचे वंजारी आहेत, अशी पुष्टीही वैभवीने जोडली.
वैभवी देशमुख हिने नामदेव शास्त्रींच्या आरोपींची कड घेण्याच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली. तुम्ही महंत आहात, महाराज आहात, आमचे गुरू आहात. तुम्ही खूप मोठे आहात, मी तुमच्यापुढे खूप लहान आहे. फक्त मला एवढंच वाटतं, तुम्ही म्हणालात देशमुखांनी चापट मारल्यामुळे आरोपींनी कृत्य केले, त्यांची मानसिकता समजावून घ्या. महाराज, माझ्या बापाच्या अंगावर अशी एक जागा नाही जिथे आरोपींनी मारले नाही. त्यांच्या अस्थीवेळी केवळ तीन हाडे मिळाली. आमची मानसिकता कोण समजून घेणार…? असा भावनिक पण तितकाच रोखठोक सवाल वैभवीने शास्त्रींना विचारला.