देशातील १३० कोटी लोकांना संघटित करण्याचे संघाचे प्रयत्न : मोहन भागवत
संघाच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विस्तारित स्पष्टीकरण देताना म्हटले आहे कि , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या विजयासाठी काम करतो, किंवा संघ कुठे आग लागली तर ती आग विझविण्याचे काम करतो , असे म्हटले जात असले तरी संघ हा केवळ दबावगट नाही तर संघाला देशातील १३० कोटी लोकांना संघटित करायचे आहे. परिस्थिती बदलत राहते, मात्र परिस्थितीला न घाबरता लढण्याचे धैर्य संघ स्वयंसेवकांनी दाखविण्याची गरज आहे. संघ शाश्वत लक्ष घेऊन वाटचाल करीत आहे, त्यामुळे परिस्थितीशी प्रसंगावधान राखून तोंड द्यायला हवे, असा सल्ला डॉ. भागवत यांनी दिला.
विदर्भात नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्रिमूर्तीनगर भागातील तरुण स्वयंसेवकांचे संमेलन नेलको सोसायटीच्या मैदानात भरविण्यात आले होते. या संमेलनाला विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते. दंड आणि घोषपथकाचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वांना संघटित करायचे आहे. जो स्वत:ला हिंदू म्हणवून घेतो त्याला सुरुवाताली संघटित करायचे आहे. हिंदू म्हणवून घेणारे सहज संघटित होतील. त्यानंतर इतरही जुळतील, सगळे आपलेच असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.