आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेचे प्राण वाचवले
औरंंंगाबाद : कौटुंबिक कलहाला वैतागलेल्या ५५ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्यासाठी सोमवारी (दि.१६) सकाळी संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाकडे धाव घेतली होती. परंतु सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष पोलिस अधिकारी श्रीमंतराव गोर्डे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी आत्महत्या करण्यास आलेल्या महिलेची समजूत काढुन तिचे प्राण वाचविले.
सातारा परिसरात राहणा-या ५५ वर्षीय महिला कौटुंबिक कलहाला वैतागली होती. नेहमीच्या कटकटीला कंटाळलेल्या महिलेने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या करण्यासाठी सोमवारी संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाकडे धाव घेतली होती. बराचवेळ एक महिला उड्डाणपुलाजवळ बसून असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष पोलिस अधिकारी श्रीमंतराव गोर्डे पाटील यांच्या लक्षात आले.
गोर्डे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी उड्डाणपुलाकडे धाव घेत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेस ताब्यात घेवून तिची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेस सुखरूप तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.