‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार मुंबई, पुणे पश्चिम महाराष्ट्रात परतीचा पाऊस वादळ-वाऱ्यासह बरसणार, सावधानतेचा इशारा
पुढील ४८ तासांत मुंबईत काही तीव्र सरींसह तुरळक पावसाची शक्यता आहे. याकाळात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तथापि, अति मुसळधार पाऊस परतण्याची शक्यता नाहीI #Marathi #Mumbai #MumbaiRains https://t.co/Vao9uazdIk
— Skymet (@SkymetWeather) October 10, 2019
स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १३ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
११ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुंबई ११ ऑक्टोबरला शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहील. तसंच हलक्या स्वरुपातील पाऊस पडेल.
पुढील ४८ तासांत पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील काही भागांत ४८ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल पण मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी वर्तवली आहे. यानंतर १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कमी होईल. पण त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असंही कश्यपी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच कोल्हापूरसह चार जिल्ह्यात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूननं देशासह मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रला चांगलंच झोडपून काढलं आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सूननं आपल्या परतीचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे. येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या सरी अशाच बरसत राहण्याची शक्यता आहे.