Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः धो धो धुतले , १६ जणांचा बळी , एक लाखाहून अधिक लोकांचे स्थलांतर : डॉ. दीपक म्हैसेकर

Spread the love

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार माजवल्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात महापूर आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात १६ जणांचे बळी गेले असून आतापर्यंत एक लाख ३२ हजार ३६० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या चारही जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान, टेरिटोरियल आर्मीची पथके आणि नौदल दाखल झालं आहे. गोव्याहूनही एनडीआरएफची चार पथके कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये आणखी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौदलाच्या दोन विमानातून एका बोटींसह २२ जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर बोटीसह कोल्हापुरात दाखल झाले. सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. काल जिल्ह्यातील २०४ गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. काल रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटींसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह कोल्हापुरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे त्यांनाही मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह ही पथकं रवाना झाली. तर कोल्हापुरात दोन बोटींच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात येत आहे. आज सकाळी नौदलाच्या दोन विमानांमधून एका बोटीसह २२ जणांचे पथकही कोल्हापुरात दाखल झाले. त्याशिवाय मुंबई-पुण्याहून नौदलाच्या १४ बोटीही कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. प्रयाग-चिखलीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू करण्यात आली आहे.

कोल्हापुरात परिस्थिती गंभीर

कोल्हापुरात एकूण २०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. काल या गावांमधून ११ हजार ४३२ कुटुंबांमधील ५१ हजार ७८५ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येत आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे. तर पाण्याची पातळी कमी करण्यासाठी कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून चार लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, या धरणाच्या प्रशासनाशी समन्वय साधण्यात येत आहे.’ अशी माहितीही पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

शाळा-महाविद्यालयांना ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी याबाबत आज आदेश जारी केला आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती याचा विचार करून यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरही जिल्ह्यातील पूरस्थिती कायम राहिल्याने ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अजूनही अतिवृष्टी आणि पूरस्थिती कायम असल्यामुळे आता ८ आणि ९ ऑगस्ट रोजी येथील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, शैक्षणिक आस्थापना आणखी दोन दिवस बंद राहणार आहेत.

महापुरामुळे कोल्हापूरमधील जनजीवन ठप्प झालं असून त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. येथील ३९० गावांमधील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पन्हाळा तालुक्यातील ७६ गावांमधील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील १६, भुदरगडमध्ये १४, चंदगड १८, गडहिंग्लज ३९, गगनबावडा १९, हातकणंगले ४१, कागल २५, करवीर ४२, पन्हाळा ७६, राधानगरी ६, शाहूवाडी ४५ आणि शिरोळ तालुक्यातील ४९ गावातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. गावांना पूराचा वेढा पडला असून रस्तेही पाण्याखाली गेल्याने इतर गावं आणि जिल्ह्यांशी कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे.

सांगलीतही पावसाचे थैमान

सांगलीतही पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. सांगलीत महापुराने बुधवारी सकाळी २००५च्या सर्वोच्च पूर पातळीचा रेकॉर्ड मोडला. आयर्विन पुलाजवळ बुधवारी सकाळी ५५ फूट पाणी पातळीची नोंद झाली. चौदा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३.९ फूट इतकी पाणी पातळी होती, या महापुराने निम्मे शहर पाण्याखाली गेले आहे. जिल्ह्यातील ७५००० हून अधिक नागरिक बाधित झाले असून १३० गावांचा संपर्क तुटला आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज. एनडीआएफ, आर्मीच्या जवानांकडून मदतकार्य सुरू आहे. वाळवा तालुक्यातील बिचूद, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, ताकारी, वाळवा, भिलवडी, औदुंबर येथे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीत पावसाचा जोर कमी असला तरी कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगलीला धोका कायम आहे. दरम्यान, धुवांधार बरसणाऱ्या पावसामुळे सोलापूरमधील उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. हे धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून १,२०,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यालाही पाण्याने वेढले

कोल्हापूर, सांगलीपाठोपाठ पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील नद्या, नाले तसेच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मावळातही पावसाचा जोर वाढला असून पवना धरण पुन्हा ९८ टक्के भरल्याने पवना धरणातून ९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पवना नदीवरील काही पूल पुन्हा पाण्याखाली गेले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला. दरम्यान, मात्र या कालावधीत धरण फुटले, रस्ता खचला तसेच पूल कोसळला असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे. तसेच आवश्यक माहिती तसेच खात्रीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला ( ०२० २६१२६२९६ ) या तसेच व्हॉटस्अॅप क्रमांक ८९७५२८३१०० यावर संपर्क साधावा. खोटी माहिती पसरवून घबराट निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही वेंकटेशम यांनी दिला आहे.

साताऱ्यातही पूरस्थिती कायम

साताऱ्यातही पूरस्थिती कायम असल्याने येथील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पूरस्थितीमुळे साताऱ्यातील काही शाळा आजही बंद ठेवण्यात आल्या आहेत. साताऱ्यातही शेकडो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून या ठिकाणीही मदतकार्य मोठ्याप्रमाणावर सुरू आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!