Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपलं ठरलंय !! मंत्री मंडळ विस्ताराचे सोडा आणि कामाला लागा , सेना -भाजप एकत्रच लढणार : उद्धव ठाकरे

Spread the love

राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची सगळ्यांना उत्सुकता लागली असताना ‘राज्य मंत्रिमंडळ विस्तार सोडा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा’, असा आदेश वजा इशारा आज झालेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिला आहे.

‘विस्तार होईल तेव्हा होईल, पण आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कशा जिंकता येतील? यासाठी कामाला लागावे लागेल’ असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत सांगितल्याचे समजते. सेना भवन येथे शुक्रवारी संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत तसेच शिवसेनेचे महत्वाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र लढणार का? असे विचारले असता ‘कुणी काहीही बोलो, शरद पवार काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका, आपलं ठरलंय विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्रच लढणार असून कोणतेही मतभेद न ठेवता कामाला लागा’, असे देखील उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांना सांगितले. ‘ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या, पण तुम्ही आपले काम करा, विजय आपलाच असेल’, असे देखील उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले आहे .

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना ‘पीक विमा लाभ मिळाला नाही, त्यांना तो पुढील पाच दिवसांत कसा मिळवून देता येईल’, यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच ‘पाच दिवसांत सर्व जिल्ह्यातील तालुक्यामध्ये शेतकरी आधार केंद्र निघाली पाहिजेत आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करा’, असे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!