Aurangabad News Update : पंतप्रधानांच्या ऑनलाईन संवादास औरंगाबाद जिल्ह्यातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रतिसाद
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्हयातील लाभार्थ्यांशी साधला संवाद
औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून यानिमित्ताने आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या तीन लाभार्थींशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवाद साधला. हा कार्यक्रम एमजीएम परिसरातील रुख्मिीनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सर्वश्री आमदार हरीभाऊ बागडे, अतुल सावे, प्रशांत बंब, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. किशोर झाडे विविध विभागाचे विभाग प्रमुख, विविध योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात असून शासन शेतकरी, महिला, वृद्ध, उद्योजक यांच्या बरोबरच सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत आहे. सशक्त भारत घडविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे सांगितले.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा केंद्र शासनाने पुन्हा सूरु करुन शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा याबाबत सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील बाळू विठ्ठल राऊत यांनी सांगितले की मी मुद्रा लोन योजनेचा लाभ घेतला असून यामुळे गणेशमुर्ती बनवण्याचा व्यवसाय वाढवला आहे. यामुळे माझे जीवनमान सुधारले आहे. तसेच सिल्लोड तालुक्यातील कृष्णा महाजन यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला आहे, असे सांगून आपल्या कुंटुबांसह पक्क्या घरात आनंदाने राहत आहे असे सांगितले. शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व आवास योजनेचा लाभ मिळाल्याने माझ्या मुलांच्या संगोपनास मदत होत असल्याची प्रतिक्रिया फुलंब्री तालुक्यातील सुवर्णा भूईगळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात व्यक्त केली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित लाभार्थ्यांनी दिलेल्या सूचना आण प्रतिसाद उत्तम असून जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अधिक लोकाभिमूख पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.