MarathawadaNewsUpdate : हृदयद्रावक : सेल्फी बेतली जीवावर , नव विवाहित जोडप्यासह तिघांचा बुडून मृत्यू !!
बीड : सेल्फी काढण्याच्या वेडापायी अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असल्या तरी अनेकांना हा मोह आवरत नाही. याच मोहातून सेल्फी काढताना बंधाऱ्यात तोल गेल्यामुळे एका नव विवाहित जोडप्यासह तिघांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे वृत्त आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात कवडगाव येथे घडली आहे. ताहा शेख ( वय 20 ), सिद्दीकी शेख (22, ), शहाब (वय 25) अशी मृत झालेल्या तिघांची नाव आहे. हे तिघेही अंबड येथील राहणारे होते.
उपलब्ध माहितीनुसार कवडगाव येथील एका खासगी उर्दु शाळेमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकाची मुलगी ताहा शेख यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. त्यानंतर आज लग्नानंतर ताहा शेख आपले पती सिद्दीकी शेख आणि त्यांचा मित्र शहाब याच्यासोबत सासरवाडीला आले होते. दुपारच्या जेवणानंतर बाहेर फिरण्यासाठी तिघे घराबाहेर पडले होते. त्यावेळी नदीच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचा मोह तिघांना आवरला नाही. सेल्फी काढत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ताहा आणि तिचा पती सिद्दीकी दोघेही नदीपात्रात बुडाले. त्यांच्यासह त्यांचा मित्र शहाबही पाण्यात पडला. तिघांनी ऐकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण यात तिघांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यात आल्यामुळे त्यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तिघे जण पाण्यात बुडाले अशी माहिती स्थानिकांनी दिली. सुदैवाने या दुर्घटनेत दोन मुलं सुखरूप वाचली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. थोड्याच वेळात पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.