Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य, डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Spread the love

मुंबई : “गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिले  आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि मुख्यत्वेकरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी  गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्यानंतर शुक्रवारीही पावसामुळे परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री स्वतः पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान “धरणं आणि नद्या ओसंडून वाहत आहे. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे. त्यानुसार नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. हे सगळं करत असताना करोनाचं संकट टळलेलं नाही. तळई येथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. परदेशातही अशा अतिवृष्टी आणि पुराच्या बातम्या आपण पाहत आहोत. सर्व मिळून संकटाला तोंड देत आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य असणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले . “पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहे. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे  लागणार आहे. त्याचवेळी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे ,” असे  आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!