CoronaMaharashtraUpdate : आजही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक , दिवसभरात आढळले १८, ३९० रुग्ण तर ३९२ रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासात दिवसभरात २० हजार २०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर १८ हजार ३९० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९२ कोरोनामृत्यूंची नोंद झाली. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या २.६९ टक्के इतका आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत २० हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत एकूण ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण या जीवघेण्या संसर्गावर मात करून घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ७५.३६ टक्के इतकं झालं आहे. गेल्या पाच दिवसांत हा टक्का सातत्याने वाढून आज पंच्याहत्तरीपार गेला आहे. हे चांगले संकेत आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याने ६० लाख करोना चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत एकूण ६० लाख १७ हजार २८४ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १२ लाख ४२ हजार ७७० जणांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण चाचण्यांच्या २०.६५ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात आज दिवसभरात १८ हजार ३९० जण करोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या २ लाख ७२ हजार ४१० इतकी आहे. राज्यातील करोनाचा मृत्यूदर ही चिंतेची बाब आहे. आज आणखी ३९२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यातील २४३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ८१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६८ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान पुणे जिल्हा वेगाने सावरताना दिसत आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८० हजारचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता. त्यात गेल्या दोन दिवसांत कमालीची घट झाली आहे. हा आकडा आज ६० हजारच्याही खाली आला. जिल्ह्यात सध्या ५९ हजार ७७४ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यानंतर ठाणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आज २८ हजार ८९४ इतकी राहिली. त्यापाठोपाठ मुंबईत सध्या २६ हजार ७६४ करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत तर नागपूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा १९१४१ इतका आहे.