MaharashtraNewsUpdate : कॉ . गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन आरोपींचा जमीन अर्ज फेटाळला
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी भरत कुरणे आणि सचिन अंदुरेे या दोघांनाही कोर्टाने जामीन नाकारला आहे. त्यांच्या अर्जावर कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी.शेळके यांच्या कोर्टात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यावर आज कोर्टात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानत कोर्टाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड, विरेंद्रसिंह तावडे यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल केले होते. यातील संशयित सारंग आकोळकर, विनय पवार या दोघांचाही अद्याप शोध सुरू आहे.
दरम्यान, कारवाई केलेल्या संशयित भरत कुरणे आणि सचिन अंदुरे यां दोघांनीही जामीन मिळावा यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आज निकाल देताना आरोपींच्या विरुद्ध सकृतदर्शनी पुरावा असल्याने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. या केसमध्ये आजपर्यंत अल्पवयीन साक्षीदारास धमकावणे, हत्येतील मोटारसायकल कोल्हापुरात आणणे, हत्येच्या कटात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होणे, बेळगावंच्या एस.टी.स्टॅण्डवर झालेल्या बैठकीला उपस्थित रहाणे, तसेच फायरिंग आणि पाईप बॉम्बस्फोटाचा सराव करणे अशा अनेक गोष्टीत दोघांचा संबंध येत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याचप्रमाणे यापैकी एक आरोपी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी होता आणि दुसरा आरोपी गौरी लंकेश हत्येत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांचा जामीन मिळण्याचा अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर व शिवाजीराव राणे यांनी केला होता.