Aurangad Lockdown Update : शहरात सर्वत्र शुकशुकाट, जिल्हाधिकारी, मनपा , पोलीस आणि विभागीय आयुक्त रस्त्यावर… कडेकोट बंदोबस्त !!
आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह विभागीय, पोलीस आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक शहरात फिरून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाहणी करीत आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रांती चौक येथील बंदोबस्तात असणाऱ्या वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
संचारबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाची ‘मास्टर प्लॅनिंग’
शहरातील प्रसिद्ध गुलमंडीवरील सन्नाटा
विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त राहणार गस्तीवर
औरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलिस, महसुल प्रशासनाने ‘मास्टर प्लॅनिंग’ केली आहे. या काळात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अधिकाऱ्यांची टिम रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेणार आहे़ दिवस-रात्र हे अधिकारी अचानक भेट देऊन गस्त घालणार आहेत.
१८ जुलैपर्यंत असणाऱ्या संचारबंदीला सुरूवात झाली आहे. संचारबंदी काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिलेला आहे. घरपोच दुध वितरण सकाळी ६ ते सकाळी ८. ३० वाजेपर्यंत, सर्व खासगी, सार्वजनिक वैद्यकीय सेवा, आस्थापना, पशुचिकित्सा सेवा यांनाच नियमित वेळेत सुरू ठेवण्यास मुभा आहे. संचारबंदीच्या नियमांचे नागरीकांद्वारे पालन होतेय की नाही, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाली आहे.
शुक्रवारी (दि.१०) संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे. यात महानगरपालिकेचे ४४० कर्मचारी, १० प्रभाग अधिकारी तसेच विभागप्रमुख, २० सुपरवायझर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०० टिम यासाठी सज्ज करण्यात आली आहे. परिस्थितीबद्दल वेळोवेळी माहिती देण्याचे या टिमच्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोबाईलवर रेकॉर्डींग करून टिमचे सदस्य अधिकाऱ्यांना माहिती पोहचविणार आहे.
दिवस-रात्र अधिकाऱ्यांची नजर
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. बंदच्या काळात कोणत्या सेवा सुरू राहतील यासंदर्भात मनपा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबरच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय हेही मैदानात उतरणार आहे. मनपा आयुक्त पाण्डेय हे सायंकाळी तसेच रात्री तर विभागीय आयुक्त केंद्रेकर हे रात्रीच्या वेळी परिस्थितीवर नजर ठेवणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी हेही अचानक अनेक भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.