Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘या’ शहरातील देशांतर्गत विमान सेवा सुरु

Spread the love

देशांतर्गत विमान सेवा आज सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सकाळी दिल्लीहून पुण्यासाठी पहिले विमान झेपावले. तर सकाळी ६.४५ वाजता मुंबईवरुन पहिल्या इंडिगोच्या विमानाने पाटणाच्या दिशेने टेक ऑफ घेतला असल्याचे मुंबई विमानतळाचे नियोजन करणाऱ्या MIAL ने सांगितले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार. मुंबई विमानतळावरून २५ विमानांचे उड्डाण आणि २५ विमानांच्या लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे.

सरकारच्या सूचनेनुसार मागील दोन महिने केंद्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. त्यामुळे विमान कंपन्यांना आर्थिक फटका बसला तसेच प्रवाशांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. गेल्या महिन्यात काही कंपन्यांनी आगाऊ तिकीट बुकिंग सुरु केले होते. मात्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान सेवा इतक्यात सुरु होणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर तिकिटांचे बुकिंग रद्द करावे लागले. आज सकाळी ८.२० मिनीटांनी लखनऊवरून मुंबई विमानतळावर पहिले विमान शहरात दाखल झाले. दोन्ही सेवा इंडिगोकडून चालवण्यात आल्या. अहमदाबादवरून आलेले स्पाईसजेटचे पहिले विमान दिल्ली विमानतळावर लँड झाले.

तिकिट दरांमधील भाववाढ रोखण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचनालयाने तिकिटांचे दर निश्चित केले आहेत. दरम्यान, सरकारने विमान कंपन्यांना आणि विमानतळ हाताळणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टंसिंगचे कडेकोट पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोर्डिंगपास काढताना तसेच प्रतिक्षालयातील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच विमानात देखील दोन आसनामध्ये एक आस रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी तोंडावर मास्क, हॅण्ड ग्लोव्ह्ज अशा प्रकारच्या उपायोजना विमान कंपन्यांनी आणि विमानतळ प्राधिकरणाने केल्या आहेत. तसेच २६ मेपासून आंध्र प्रदेश, २८ मेपासून पश्चिम बंगालमध्येही विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी अम्फान महाचक्रीवादळ आले होते या वादळात ८५ नागरिकांचा मृत्यू झाला. जवळपास १ लाख नागरिकांना या वादळाचा फटका बसला. तसेच कोलकाता विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यास नकार दिला. पण २८ मेपर्यंत सर्व पायभूत सुविधा सज्ज केल्या जातील आणि पश्चिम बंगालमधील विमान सेवा सुरू करण्यात येईल. बऱ्याच राज्यांनी उड्डाण मर्यादित ठेवली आहेत. कोलकाता आणि बागडोग्रा या विमानतळांवर येत्या गुरुवारपासून फक्त २० उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली आहे. हैदराबाद विमानतळावर फक्त ३० उड्डाणांना परवानगी दिली गेली आहे. यापैकी १५ विमानांच्या उड्डाणांना आणि १५ विमानांच्या लँडिंगला परवानगी दिली गेली आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम विमानतळावरील सेवा अजून सुरू होणार नसल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!