AurangabadUpdate : आरटीओ कार्यालयाची १२ पथके रस्त्यावर, संचारबंदीत विनाकारण फिरणा-यावर कारवाई
औरंंंगाबाद : लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू असतांना देखील रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनधारकांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या मदतीला आता आरटीओ अधिकारी धावून आले असून आरटीओ कार्यालयाची १२ पथके विनाकारण फिरणा-या वाहनधारकांवर कारवाई करण्यासााठी रस्त्यावर उतरली आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात संचारबंदी लागू असतांना देखील शेकडो वाहनधारक रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातील अनेक वाहधारक हे विनाकारण फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनधारकांवर पोलिसांनी सक्तीने कारवाई केल्यास, वाहनधारक पोलिसांवर हात उचलायला अथवा पोलिसांना धक्काबुक्की करायलाही मागे पुढे पाहत नाहीत.
रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला आता आरटीओ अधिकारी सरसावले आहेत. गेल्या दोन दिवसापासून आरटीओची ८ पथके शहरातील विविध भागातील चौकात थांबून वाहनधारकांवर कारवाई करीत होते. आरटीओच्या ८ पथकांनी दोन दिवसात १०० च्या वर रिक्षांवर कारवाई केली आहे. किरकोळ कारणासाठी घराबाहेर पडणा-या रिक्षांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने आपल्या पथकांची संख्या वाढवत १२ वर नेली आहे.