भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने घेतला स्वतःकडे , एनआयए करणार तपास
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार , गृमंत्री अनिल देशमुख , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकूण वक्तव्याचा रोख लक्षात घेऊन भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) स्वत:कडे घेतला असल्याचे वृत्त आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना एनआयएने माहिती दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एनआयए करेल असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणानंतर तेव्हाच्या भाजप सरकारने काही दलित कार्यकर्ते व विरोधी पक्षनेत्यांचे फोन व व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने चौकशीच्या हालचाली सुरू केल्या असतानाच कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतल्याने या दोन गोष्टींची काही लिंक आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणी झालेल्या कारवाईची फेरचौकशी सुरू केली असतानाच अचानक राष्ट्रीय तपास संस्थेने संबंधित प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतल्याने यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एनआयएच्या तपासाच्या कक्षेत हे प्रकरण येते हे कळायला दोन वर्षे का लागली?, हा प्रश्न येथे उपस्थित होत असून याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी पक्षाची भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे.