Good News : ऑनलाईन शॉपिंगच्या नियमात अनेक महत्वपूर्ण बदल , २४ तासात द्यावे लागेल रिफंड
ई-कॉमर्स कंपन्यांच्या मनमानीपासून ग्राहकांचा बचाव व्हावा म्हणून नवीन नियम तयार करण्यात आले असून हे नियम ३१ मार्चच्या आधी लागू करण्यात येणार आहेत. या नियमांनुसार ई कॉमर्स कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे भाव मनमानीपणे लावू शकणार नाहीत. पंतप्रधान गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे.
ग्राहकांना येत असलेल्या अनुभवावरून ऑनलाइन शॉपिंगच्या नियमांबद्दल २ डिसेंबरपर्यंत सूचना मागवून घेण्यात आल्या होत्या. नव्याने लागू करण्यात येणारे हे नियम ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत लागू करण्यात येणार आहेत. यामुळे नकली उत्पादनांच्या विक्रीला कंपन्यांना जबाबदार धरण्यात येणार असून फसवणुकीला आळा बसेल . रिफंडची प्रक्रिया सुधारण्यात आली असून २४ तासांत ग्राहकांना रिफंड मिळणार आहे. यामुळे कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीही देऊ शकणार नाही. त्याचबरोबर या कंपन्यांना भारतात नोंदणी करणं महत्त्वाचं होणार आहे.
येत्या २०२४ पर्यंत ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण एवढं वाढेल की जागतिक आरोग्य संघटना याला व्यसन म्हणून घोषित करतील, असा दावा रिसर्च फर्म गार्टनरने केला होता. २०२२ पर्यंत दरवर्षी ऑनलाइन शॉपिंगमध्ये १० टक्क्यांची वाढ होणार आहे, असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून लोक गरजेपेक्षा जास्त खरेदी करू लागतील. हे शॉपिंग करताना लोक आपल्याकडे किती पैसे आहेत हेही विसरतात आणि एकाहून एक वस्तू विकत घेतात. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगमध्ये कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी हे नियम बदलण्यात आले आहेत. लोकांवरचं आर्थिक संकट वाढू नये म्हणून शासनाकडून या नियमांची अमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.