Maharashtra : उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर घेतला पहिला निर्णय , उद्या दुपारी स्वीकारणार मुख्यमंत्रीपदाचा पदभार
Maharashtra CM Uddhav Thackeray after first cabinet meeting, in Mumbai: I want to assure the people of the state that we will give a good government. I want to help the farmers in a manner which will make them happy. pic.twitter.com/mJ41CzuAtu
— ANI (@ANI) November 28, 2019
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक शपथविधी पार पडताच सह्याद्री विश्रामगृहात झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांसह पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकर परिषदेत कॅबिनेटमधील निर्णयांची महिती दिली. तसेच आगामी काळात राज्य सरकार कसे काम करेल याची माहिती दिली. दरम्यान उद्धव ठाकरे उद्या दुपारी एक वाजता मंत्रालयात जाऊन पदभार स्विकारणार आहेत.
आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यासाठी २० कोटी मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील हे सरकार सर्व सामान्य माणसाचे सरकार असेल. राज्यात कोणालाही दहशत वाटणार नाही, असे ही ठाकरे यांनी सांगितले. आतापर्यंत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणती आणि किती मदत झाली याची माहिती घेण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले असून ही माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, अशी टीका नव्या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मंत्रिमंडळ कोणाचे असते याचा त्यांनी अभ्यास करून यावा असे उत्तर दिले.
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सेवे पासून कामाला सुरुवात । रायगड किल्ला संवर्धनासाठी २० कोटी मंजूर । राज्यात कुणाला दहशत वाटेल अस वागणार नाही । हे सरकार सामान्य माणसाचे सरकार असेल । शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करयाची नाही ।शेतकऱ्यांना मोठी मदत करणार, दोन दिवसात करणार घोषणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर जनसागराच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. जनसागराला अभिवादन केलं आणि सिद्धीविनायकाच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे ८ वाजून ४५ मिनिटाला सह्याद्रीवर पोहोचले. त्यांनी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून या बैठकीत अधिवेशन बोलवण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांना दिल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत अधिवेशन बोलावण्यासंदर्भातील चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर शपथ घेतल्यानंतर भाषण केलं नाही. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याने कॅबिनेटमध्ये त्यासंदर्भात आजच निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणात वेळ न घालवता तडक सह्याद्री अतिथीगृह गाठल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, सह्याद्रीवर सुरू असलेल्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. स्टेजवर गुडघ्यावर बसून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला अभिवादन केलं. त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, पीआरपीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते मनोहर जोशी, शिवसेना नेते संजय राऊत, सपा नेते अबु असीम आझमी, राजू शेट्टी, कपिल पाटील यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व आमदार, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य आणि वारकरीही उपस्थित होते. जैन मुनींनीही स्टेजवर येऊन उद्धव ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.