Video : आज दिवसभरात । महानायक ऑनलाईन । महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात काय काय झालं ? संसदेतील संविधान दिनावर विरोधी पक्षाचा बहिष्कार
आज दिवसभरात । महानायक ऑनलाईन । २५ नोव्हेंबर २०१९
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात काय काय झालं ?
- सर्वोच्च न्यायालय
आज सकाळी १.३० वाजता महार्ष्ट्राचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं होत. महाराष्ट्रात शनिवारी जी शपथ घेतली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्या सगळ्या कार्यवाहीची कागदपत्रं सर्वोच्च न्यायालयाने आज मागवून घेतली आणि दोन्हीही बाजू ऐकून घेतल्या. आता उद्या सकाळी ११.३० वाजता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात आपला निकाल देणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
राज्यपालांनी केलेली कार्यवाही न्यायालयाला जर योग्य वाटली तर बहुमताची चाचणी राज्यपालांनी आदेशित केल्याप्रमाणे ३० तारखेला होऊ शकते किंवा न्यायालय २४ तासात बहुमत चाचणी घेण्याचेही आदेशित करू शकते. अर्थात तो अधिकार न्यायालयाचा आहे पण त्याआधी तो राज्यपालांचा आहे. पण आता उद्या काय निकाल येतो हे पाहणे म्हत्वाचे आहे.
प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारची बहुमत चाचणी २४ तासात होईल कि ३० तारखेला होईल हा नाही तर या परीक्षेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पास होतील का ? हा प्रश्न आहे. दावा दोन्हीही पक्षांकडून म्हणजे नव्याने स्थापन झालेल्या सेना –कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीकडूनही करण्यात येतो आहे कि , बहुमत आमच्याकडे आहे आणि भाजपकडूनही दावा करण्यात येतो आहे कि , बहुमताची परीक्षा आम्ही पास होणारच यात कुठलीही शंका नाही.
- ओळख परेड
आज रात्री झाले असे कि , खा. संजय राऊत यांनी ट्विट केल्याप्रमाणे महाविकास आघाडीने आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आम्ही १६२ या विशेष कार्यक्रमाचे हॉटेल ग्रांड हयात मध्ये या खास परेड शो चे आयोजन करण्यात आले होते. नेत्यांमध्ये या शक्ती प्रदर्शनाला घेऊन मोठा उत्साह होता. यावेळी आम्ही सागळे एक आहोत / एक राहूत अशी प्रतिज्ञाही घेण्यात आली आणि आमदारांनाही देण्यात आली. आता यामध्येही प्रश्न असा आहे कि , किती आमदार आपल्या शपथेवर कायम राहतात.
आमदारांच्या या एकत्रित बैठकीला स्वतः शरद पवार ,उद्धव ठाकरे , कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात यांनी संबोधित केले.
- शरद पवार / उद्धव ठाकरे
‘महाराष्ट्राच्या हिताचा संकल्प आपण सर्वांनी केला. केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी काही राज्यात बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली. कर्नाटक, गोवा आणि मणिपुरातही तेच केलं. संसदीय बाबी ज्या आपण करतो त्या सर्वांना हरताळ फासला जात आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे होत आहे. चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन केली, त्या ठिकाणी काही कोर्टाच्या केसेस चालू आहेत. तर काहींचे निकाल लागले आहेत. सुप्रीम कोर्टाचा ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी आपली बहुमत सिद्ध करण्याची तयारी असेल. आम्ही एक महिन्यापूर्वीच गटनेते पदाची निवड केली, पण अजित पवार तिकडे गेले. त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना व्हिपचा अधिकार आहे, याची भीती नवीन सदस्यांना दाखवली जात आहे. आदेश देण्याचा अधिकार निलंबित केलेल्या नेत्याला नसतो. ज्याला सदस्यत्व जाण्याची भीती आहे, त्यांची मी स्वतः जबाबदारी घेतो. कुणीही संभ्रमात पडू नये. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. इथे काहीही खपवून घेतलं जात नाही. आपण योग्यला योग्य म्हणतो, जे योग्य नसताना लादण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आता आपल्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे धडा शिकवण्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही,’ असं शरद पवार म्हणाले.
बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे, असा सज्जड दम शरद पवार यांनी दिला. याशिवाय कुणी आडवा आला तर त्याचं काय करायचं हे शिवसेना पाहून घेईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
- नारायण राणे / भाजपची टीका
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालेल्या आमदारांच्या ओळख परेडमध्ये १६० नव्हे तर फक्त १३० आमदारच उपस्थित होते. त्यातील ३० आमदार गैरहजर होते, असा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. ओळख परेडला गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेचे आमदार सर्वाधिक होते. त्यामुळे शिवसेनेला फुटीचा मोठा फटका मोठा बसेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणे यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले.
- राज्यपालांना पत्र
आज सकाळी अजून एक गोष्ट अशी झाली कि , शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सह्यानिशी राज्यपालांना निवेदन देण्यात आले कि , देवेंद्र फडणवीस बहुमताची चाचणी पास करू शकले नाही तर पुन्हा राष्ट्रपती राजवट न लावता , आमच्याकडे १६२ आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी देण्यात यावी. आता तांत्रिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित करण्यात आहे कि , राज्यपालांना सत्ता स्थापन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अशा निवेदनावर तिन्हीही गत नेत्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या आहेत त्या नाहीत त्यामुळे या निवेदनाचा राज्यपाल विचार करू शकतील कि नाही.
- अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न
आज दिवसभरात आणखी एक गोष्ट घडली कि , राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. याउलट आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात जाऊन आपली हजेरी लावली आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेऊन कामकाजाला प्रारंभही केला.
आता प्रश्न असा चर्चिला जात आहे कि , राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जर अजित पवार एकटे वगळता ५३ आमदार असतील तर त्यांची मनधरणी करण्याची गरज काय ? तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशी शंका वाटते कि ,आज जरी १६२ आमदार आम्ही आघाडीसोबत आहोत असे सांगत असले तरी बहुमत चाचणीच्या वेळी अजित पवार यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले तर काय करणार ? हा प्रश्न आघाडीच्या नेत्यांसाठी अधिक त्रासदायक आहे.
- सिंचन घोटाळा आणि अजित पवार
आज दुपारी चार नंतर एक बातमी अशी आली कि , सिंचन घोटाळ्याशी संबंधित ९ प्रकारांची चौकशी बंद करण्यात अआली आहे आणि अजित पवारांना ही पहिली बक्षिशी आहे. दुपार नंतर या बातम्या चालत राहिल्या पण महाराष्ट्राचे ए सी बी चे महासंचालक परमजितसिंग यांनी खुलासा केला यातील एकही प्रकरण अजित पवार यांच्याशी संबंधित नाही आणि ही एक रूटीन प्रक्रिया आहे. अर्थात अजित पवार यांच्यावरील ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल भाजप नेत्यांना हा प्रश्न जेंव्हा विचारण्यात आला तेंव्हा त्यांनी सांगितले कि , हे सर्व प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर अधिक बोलणे उचित नाही.
- संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार
आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करणार आहेत मात्र या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी घेतला असल्याचे वृत्त आहे. या बहिष्कारात नव्यानेच काँग्रेस -राष्ट्रवादीबरोबर आलेल्या शिवसेनेनेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन विरोधी पक्षांनी सरकारविरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या धरणे आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक या पक्षांसह शिवसेनेचे खासदारही सहभागी होणार आहेत. शिवसेना हा भाजपचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्वात जुना घटकपक्ष आहे. परंतु महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ सुरू आहे त्यात हे दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्या संघर्षातून शिवसेना आता काँग्रेससोबत आहे. आता या दोन्ही पक्षांतील लढाई अधिकच विकोपाला गेली असून त्याचे पडसाद संसदेपर्यंत पाहायला मिळत आहेत.
दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत बोलताना ‘महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली’ असे नमूद करत सरकारवर तोफ डागली. खरंतर मला आज येथे काही प्रश्न मांडायचे होते. मात्र उघड उघड लोकशाहीची हत्या होत असताना त्याचा निषेध म्हणून मी आज कोणताही प्रश्न येथे मांडणार नाही, अशी भूमिका राहुल यांनी घेतली.
आज देशभरात ७०वा संविधान दिवस साजरा करण्यात येत असून हे औचित्य साधून केंद्र सरकारने संसदेचं संयुक्त सभागृह बोलावले आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होत असलेल्या या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. संयुक्त सभागृह सकाळी दहा वाजता सुरू होईल व दुपारी एक वाजेपर्यंत हा सोहळा चालेल, असे सांगण्यात आले.