चर्चेतली बातमी : रामदेवच्या विरोधात सोशल मीडिया भडकला , देशभरातून जाहीर माफीची मागणी
योगगुरू बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात गदारोळ सुरू झाला. बाबा रामदेव यांनी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना वैचारिक दहशतवादी संबोधलं होतं. त्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून बाबा रामदेव यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर , डॉ. अजित नवले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही रामदेवच्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्याविरोधात भडका उडाला आहे. ट्विटरवर बाबा रामदेव आणि पतंलजीविरोधात हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.#ShutdownPatanjali, #ArrestRamdev, #BycottPatanjaliProducts #पतंजलीकाबहिष्कार माध्यमातून नेटिझन्स त्यांचा संताप व्यक्त करत आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत रामदेव बाबा यांनी, ईश्वर मानणारे मूर्ख असतात असे म्हणणारे पेरियार यांचे अनुयायी वाढत आहेत. पेरियार यांचे अनुयायी ईश्वराला सैतान म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक देश, एक कायदा, जातीमुक्त भारत, समानता न्याय या संकल्पांचा मी चाहता आहे. मात्र, महापुरूषांचे अनुयायी खतरनाक आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये देखील मूलनिवासी ही संकल्पना राबवणारे लोक आहेत. मी भेदभाव पाळत नाही. मी दलितांना आचारी, संन्यासी बनवलं. शिक्षणसंस्थेचं प्रमुख केलं. पण आता दुरावा निर्माण केला जात आहे. वैचारिक दहशतवादाविरोधात देशात कायदा व्हायला हवा, अशा प्रकारचे लिखाण सोशल मीडियातून हटवायला हवं.’ असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं. मात्र, असं मत व्यक्त करून बाबा रामदेव यांनी महापुरूषांचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे.
बाबा रामदेव यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर माफी मागावी या मागणीनं जोर धरला आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे निर्माण झालेला हा वाद शांत करण्यासाठी बाबा रामदेव यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.