मोहन भागवतांना तुरुंगात टाकतो असे का म्हणाले ‘व्हीबीए’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर ?
वंचित बहुजन आघाडीचीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जाणवेधारी असून मुस्लिम समाज आमच्यासोबत आला आणि आमची सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन दिवसांसाठी तुरुंगात टाकू, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
औरंगाबाद येथे आयोजित मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले कि , बिहारमधील एका खासदाराकडे एके ४७ बंदूक बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगात टाकले जाते. मात्र मोहन भागवत यांच्याकडे एके ४७ सारखे घातक शस्त्रे असूनही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? त्यांच्याकडून याबाबत कुठलाही खुलासा का केला जात नाही ? अशा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर म्हणाले की, आमची सत्ता आल्यास त्यांना दोन दिवस तरी तुरुगांत टाकणार. कायदा सर्वांना सामान आहे .
या मेळाव्यात बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसवरही शरसंधान साधले आहे. मुस्लिम समाजाने नेहमीच काँग्रेसला मतदान केले. मात्र काँग्रेसच्याच काळात दंगली उसळल्या होत्या, अशी आठवण त्यांनी करुन दिली. आधी दंगली, त्यानंतर बॉम्बस्फोट आणि आता मुस्लिम समाजाला दाबण्यासाठी मॉब लिचिंगसारखी थिअरी आणली आहे. मुस्लिमांना सतत भीतीच्या सावटाखाली ठेवण्यासाठी व्यवस्था काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही काँग्रेससोबत बोलणी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी ज्याठिकाणी तीन निवडणुका हरत आली आहे, त्या जागा आम्ही त्यांच्याकडे मागितल्या होत्या. काँग्रेसने जिंकलेल्या जागा आम्ही मागतच नव्हतो. मात्र हरणाऱ्या जागा देण्यासही काँग्रेसने नकार दिला होता. यावरूनच काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष धोरण उघडे पडते. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार नसल्याचे आंबेडकर म्हणाले.