बिहार : पोलिसांच्या चकमकीत ३ ठार, ३ अटकेत
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील बहलोलपुर येथे विशेष कृती दल आणि दरोडेखोरांमध्ये शनिवारी पहाटे चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी ३ दरोडेखोर ठार झाले असून ३ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल आणि दोन पिस्तूलांसह दारुगोळा जप्त केला आहे. तर फरार झालेल्या दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.
वैशाली जिल्ह्यातील महनार पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या बहलोलपुर भागात दरोडेखोर लपले असल्याची माहिती बिहार पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी विशेष कृती दलाच्या पथकासह संबंधित परिसराला घेराव घातला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जवळपास अडीच तास पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत ३ दरोडेखोरांचा खात्मा झाला असून यामध्ये मनीष सिंह आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे. मनीष सिंहच्या टोळीने जयपूर, कोटा, कोलकातासह अनेक शहरात दरोडे घालून लूट केली आहे. अनेक राज्यांचे पोलीस या टोळीच्या मागावर होते.