१२ व्या विश्वचषक सामन्याचा भव्य दिव्य उद्धाटन सोहळा , उपस्थितांमध्ये ५० टक्के भारतीय !!
भारतातील लोकसभा निवडणूका संपल्यानंतर आता विश्वकप सामन्यांची मालिका सुरु होणार असून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या १२ व्या विश्वचषक सामन्याचा भव्य दिव्य उद्धाटन सोहळा बॅकिंगहॅम येथील लंडन मॉलमध्ये पार पडला. संगीत, मनोरंजनाची खचाखच मेजवाणी असलेल्या या सोहळ्यात क्रिकेट प्रेमींचा एकच जल्लोष पाह्यला मिळाला. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या सोहळ्याला क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू, क्रिकेट प्रेमींसह इंग्लंडचं शाही घराणंही उपस्थित होते . विशेष म्हणजे या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांपैकी ५० टक्के भारतीय होते. त्याबद्दल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं समाधानही व्यक्त केलं. आमचा खेळ चांगला होईल आणि येथील क्रिकेटप्रेमींचा आमच्यावर लोभ राहिल, अशी आशा विराटनं व्यक्त केली.
भारतीय प्रमाण वेळेनुसार बरोबर साडे नऊ वाजता विश्वचषकाच्या उद्घाटनाचा हा सोहळा सुरू झाला. यावेळी भारत, पाकिस्तान, बांग्लादेशसह विविध देशांतील क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली होती. यावेळी ही गर्दी आवरताना सुरक्षा रक्षकांचीही दमछाक उडाली. उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीच्या आधी सर्वच्या सर्व दहाही संघाच्या कर्णधारांना स्टेजवर पाचारण करण्यात आलं. महाराणी एलिझाबेथ यांनी सर्व कर्णधारांची भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं. यावेळी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीयन रिचर्ड्सही उपस्थित होते. यावेळी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, फरहान अख्तर, महेला जयवर्धने, बांग्लादेशचा क्रिकेटपटू अब्दूल रज्जाक, पाकिस्तानचा अजहर अली, नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफजई, ब्रेट ली, जेम्स फ्रँकलिन, जॅक्स कलिस आणि के. केव्हिन पीटरसन आदी मान्यवर उपस्थित होते.