IndiaNewsUpdate : मेक इन इंडियावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : मेक इन इंडिया उपक्रमावरून काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मेक इन इंडिया उपक्रमाच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच भारताच्या आर्थिक आव्हानांसाठी खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याऐवजी फक्त घोषणाबाजी करण्यावर केंद्र सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त घोषणा करण्यात पुढे असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
खासदार राहुल गांधी यांनी मेक इन इंडिया संदर्भात एक्सवर ट्विट करत म्हटले आहे की, “मेक इन इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, तेजी येईल असे आश्वासन दिले होते . मग उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर का आहे? तरुणांची बेरोजगारी का वाढली आहे? मग चीनमधून होणारी आयात दुप्पट का झाली आहे?”, असे सवाल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.
राहुल गांधींनी पुढे म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेक इन इंडियावरील उपयांऐवजी घोषणा देण्यावर पुढे आहेत. २०१४ पासून उत्पादन आपल्या अर्थव्यवस्थेच्या १४ टक्क्यापर्यंत घसरलं आहे. भारताला एका मूलभूत बदलाची आवश्यकता आहे, जी प्रामाणिक सुधारणा आणि आर्थिक पाठिंब्याद्वारे लाखो उत्पादकांना सक्षम बनवेल”, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
चीनमधून आयात दुप्पट वाढली
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर जोरदार टीका करताना ही योजना देशात खऱ्या अर्थाने उत्पादनाला चालना देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. “आज भारताचं उत्पादन जीडीपीच्या फक्त १४ टक्के असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याच वेळी तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, दुसरीकडे चीनमधून होणाऱ्या आयातीत दुप्पट झाली आहे”, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.