NCP NewsUpdate : आ. सतीश चव्हाण यांचा विषय आहे तरी काय ? पक्षाने त्यांना निलंबित का केले ?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या विद्यमान आमदारांमध्ये धावपळ सुरु झाली असून आपण आहोत त्या पक्षाने तिकीट दिले नाही तर मिळेल त्या पक्षाकडून तिकीट घायचे आणि मिळालेच नाही तर बंडखोरी करायची अशी भूमिका अनेक आमदार घेत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर पक्षाने 6 वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सतीश चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे आमदार असून, गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या जागेवर भाजपचा आमदार असल्यामुळे त्यांना महायुतीतून तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळेच ते शरद पवारांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी केली सरकारवर टीका…
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असे सतीश चव्हाण यांनी म्हटले होते. चव्हाण यांनी थेट पत्र लिहून आपली भूमिका जाहीर केली होती. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी टीका त्यांनी केली होती.