CourtNewsUpdate : ‘संभाजी भिडे यांचं नाव वगळा’; जनहित याचिकाकर्त्यांना हाय कोर्टाचे निर्देश…
मुंबई: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. मुंबई हाय कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
महान पुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेक प्रकरणे आहेत. अशी अनेक प्रकरणे असताना फक्त संभाजी भिंडे यांच्याविरोधातच जनहित याचिका दाखल का? असा प्रश्न कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला आहे. जनहित याचिका केवळ एका व्यक्तीच्या विरोधात दाखल करता येत नाही, अशी टिप्पणी हाय कोर्टाकडून करण्यात आली आहे.
कोर्टाने म्हटलं की, महान पुरुषांच्या संदर्भात काही अवमानकारक किंवा बदनामीकारक वक्तव्य येत असतील तर त्याविरोधात जनहित याचिका होऊ शकते, पण एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जनहित याचिका होऊ शकत नाही, कारण ही जनहित याचिका आहे. आपल्या याचिकेत कुमार सप्तर्षी यांनी म्हटले आहे की , ‘महान व्यक्तींविरोधात वारंवार वादग्रस्त वक्तव्य येत असतील तर त्याला रोखण्यासाठी एखादा कायदा केला जावा. तसेच आयपीसीमधील मानहानीची कलमे ४९९ आणि ५०० यांचा उपयोग होणार नसेल तर ती रद्द करण्यात यावीत.
त्यावर हायकोर्टाने म्हटलं की एखाद्या व्यक्तीविरोधात जनहित याचिका दाखल केली जाऊ शकत नाही. या याचिकेतील संभाजी भिडे यांचे नाव वगळावे. पण, याचिकाकर्ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. आपण तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्यावा, आम्ही हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात न्यायचं का ते ठरवू, असं याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून कोर्टात सांगण्यात आलं.