MaharashtraNewsUpdate : वाईन विक्रीच्या निर्णयावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारवर कवितेतून अशी केली टीका !!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन आणि दारू यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असा केलेला युक्तिवाद चुकीचा आहे. दारु आणि वाईन हे एकच आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुपरमार्केटसमध्ये वाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास रिपाईकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत सुपरमार्केटस आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १००० चौरस फुटांचे क्षेत्रफळ असलेल्या दुकानांमध्ये वाइन विक्रीसाठी ठेवता येईल असे म्हटले आहे.
शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ,
‘ सुपरमार्केटमध्ये जर आला दारुचा माल,
तर लोकांचे होणार फार हाल,
सरकारची आहे चुकीचा चाल,
भविष्यात या सरकारचे होणार हाल’
अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. भाजपनेही सरकारच्या या निर्णयावर तीव्र टीका केली असून विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र बनविले जात असल्याचे म्हटले आहे. तर सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकारपरिषदेत या निर्णयामागील सरकारची भूमिका स्पष्ट कार्ट्याना , या विषयावरून लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. वाईन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. महाराष्ट्रात उत्पादन होणारी सर्व वाईन राज्यात खपत नाही. इतर राज्यांमध्ये आणि परदेशात ती निर्यात केली जाते. पण काहीजण मद्यराष्ट्र वगैरे बोलून विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यामुळे जनतेचे नुकसान होईल, असे निर्णय घेणार नाही. मध्य प्रदेश सरकारने तर दारु घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यावरुन टीका करु शकतो, पण तसे करणार नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले.