MaharashtraNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपच्या ‘त्या आमदारांचे निलंबन रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असून भाजपने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून न्यायालयाचे दिलसे एकाच पक्षाला कसे मिळतात ? आम्हाला का मिळत नाहीत असा प्रश्न यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.
राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असताना , विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याविरोधात भाजपने आधी राज्यपालांकडे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
Supreme Court quashes one-year suspension from the Maharashtra Legislative Assembly of 12 BJP MLAs while terming it unconstitutional and arbitrary. MLAs were suspended for one year for allegedly misbehaving with the presiding officer. pic.twitter.com/LsXiT9MtNR
— ANI (@ANI) January 28, 2022
भाजप आमदार आशिष शेलार व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात विधानसभेच्या आदेशाला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवरील सर्व युक्तिवाद गेल्या आठवड्यात संपल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान आज न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला.
नेमका आरोप काय होता ?
गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे , माईक खेचणे , त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणे , शिवीगाळ करणे , अपशब्द वापरून गैरवर्तन करणे , या आरोपावरून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते.
हे आहेत ते १२ आमदार
आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)
अभिमन्यू पवार (औसा)
गिरीश महाजन (जामनेर)
पराग अळवणी (विलेपार्ले)
अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)
संजय कुटे (जामोद, जळगाव)
योगेश सागर (चारकोप)
हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)
जयकुमार रावल (सिंधखेड)
राम सातपुते (माळशिरस)
नारायण कुचे (बदनपूर, जालना)
बंटी भांगडिया (चिमूर)