देशातील 30% वाहन परवाने बोगस : नितीन गडकरी

देशातील 30% वाहन परवाने हे बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केला. मात्र, त्याचबरोबर आपले अधिकारी आणि इंजिनियर्स ह्यांना ह्या बोगस लायसन्स, रस्त्यावरचे मृत्यू ह्याला जवाबदार धरले आहे. गडकरी हे रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ह्या कार्यक्रमाला अभिनेता मकरंद अनासपुरेही उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वाहन परवाना घ्यायला सर्वात सोपा देश भारत आहे. आरटीओ ऑफिसर्सची माफी मागतो. पण, गांधीजी दिसले की मारा ठप्पा. सांगायला लाज वाटते पण 30% लायसन्स बोगस असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय. आपला मुलगा किंवा मुलगी मरेपर्यंत लोक सुधारत नाही. मी स्वतः कधीही सरकारी गाडी वापरत नाही. कुठल्याही पदावर जाऊ देत कारण सुरक्षा महत्वाची आहे. यासाठी मी नियम बदलले आहे.
गरीब माणसालाही सुरक्षा हवी का म्हणून एअर बॅग्स फक्त मोठ्या गाड्यांना? सर्व गाड्यांना एअर बग्स हव्या, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. ह्यावेळी पैसे मिळाले की आरटीओ अधिकारी लायसन्स देतात अशी टीकाही त्यांनी आपल्याच व्यवस्थेवर केली आहे. तर रस्त्यावरच्या अपघाताला गडकरींनी आपल्याच इंजिनियर्सला जबाबदार धरले आहे. रोड इंजिनियरिंग महत्वाचे आहे. अर्ध्या रस्त्यावरच्या मृत्यूंना तर ह्यांचे इंजिनियर जबाबदार आहे. ह्यांचा डी पी आर, ह्यांचे लोक इतके फ्रॉड आणि बोगस आहेत. मी आता 12000 कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट्स ठीक केले आहे. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर जयसिंगपूर येथे 150 लोकांना रस्ता वाकडा असल्यामुळे जीव गमवावा लागला. पण, कोणी काही केले नाही. तो मी ठीक केला आता कोणी तिथे पडत नाही, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.