MaharashtraNewsUpdate : राज्य लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. “एमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारनं एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती पाठोपाठ एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. मराठा संघटनांनी ही मागणी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे राज्य सभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा व ‘वेळ आल्यास तलवारी काढू’, असा इशारा दिला होता. या मुद्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टिव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.
राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यात करोना साथ सुरू झाल्यापासून चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाच्या नियोजनानुसार सर्वात आधी ५ एप्रिल रोजी हि परीक्षा होणार होती. त्यानंतर १३ सप्टेंबरला होणार होती, मात्र त्याच दिवशी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलून २० सप्टेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयोगाने ७ सप्टेंबरला सुधारित वेळापत्रक जाहीर करून राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला घेण्याचे आयोगाने जाहीर केले होते.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले कि , मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र्य बघावं आणि नंतर टीका करावी. मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारनं विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी करत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. “सरकार निष्फळ ठरलं आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना काहीही फायदा मिळणार नाही,” असंही आंबेडकर म्हणाले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी डॉ . पायल तडवी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरोपी महिला डॉक्टरांना पुढुळ अभ्यासक्रमाची परवानगी देण्यासंबंधी दिले निर्णय योग्य नाही याबाबत शासनाच्या वतीने आदिवासी समितीने पुनर्विचार याचिका दाखल करावी . केंद्र शासनाच्या अँटी रँगिंग कायद्याचे या आरोपींनी उल्लंघन केले असल्याने त्यांना अशी परवानगी देण्याची गरज नाही असे मत व्यक्त केले.