CoronaEffect : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर , दोन मुलांसह आईचा मृत्यू , पूर्ण कुटुंबालाच कोरोनाने घेरले ….

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून शनिवारी दिवसभरात १०२९ जणांना करोनाची बाधा झाली. यामुळे आतापर्यंतचा कोरोना बाधितांचा आकडा ३९ हजारावर गेला आहे. दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतचा आकडा बाराशेवर पोहोचला आहे. कागल येथे एकाच दिवशी पती व पत्नीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे बळी वाढत असल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान एका नातेवाईकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी सारे एकत्र आल्याने त्याचा संसर्ग घरातील अनेकांना झाला. लक्षणं दिसू लागल्याने घरातील सर्व जण विविध रुग्णालयात दाखल झाले. पण उपचार सुरू असताना शनिवारी एकाच घरातील तिघांचा करोनाने बळी घेतला. दोन मुलांसह आईचा मृत्यू झाल्याने पन्हाळा तालुक्यातील कळे या गावात शोककळा पसरली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथे देसाई कुटुंबीयांचा वाळू विक्रीचा व्यवसाय आहे. या कुटुंबातील एका नातेवाईकाचे पंधरा दिवसांपूर्वी करोना संसर्गाने निधन झाले. तो धक्का सहन न झाल्याने त्याच्या आईचाही गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. या दरम्यान, देसाई कुटुंबातील सर्वांनाच कोरोनाची लक्षणे दिसू लागली. काही दिवस त्यांनी घरातच उपचार केले. पण त्याला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने कोल्हापुरातील विविध रुग्णालयात पती, पत्नी यांच्यासह तीन मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पहाटे आई मालुबाई देसाई व मुलगा दीपक देसाई यांचा मृत्यू झाला. दुपारी दुसरा मुलगा सागरचाही कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, एका मुलावर उपचार सुरू असून वडिलांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
कोरोनामुळे बळी पडलेल्या दोन्ही मुलांचा विवाह झाला असून त्यांना दोन दोन मुले आहेत. तिसरा मुलगा पोलीस असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत. मयत दोघे भाऊ वाळू विक्रीचा व्यवसाय करत होते, त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे गावात त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. करोना संसर्गामुळे कळे गाव दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता, पण पाचव्या दिवशी सर्व दुकाने सुरू केली, आज गावातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व दुकाने पुन्हा बंद करण्यात आली.