CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात २२ हजार रुग्णांना डिस्चार्ज , ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह रुग्ण

गेल्या २४ तासात राज्यात आज तब्बल २२ हजार ७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंतचा हा एका दिवसातील सर्वोच्च आकडा ठरला आहे. राज्यात आजवर एकूण ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ७१.४७ टक्के झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २० हजारावर नवीन रुग्णांची भर पडत आहे. आजही त्यात फारसा फरक झाला नाही. २४ तासांत २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ९३ हजार ३४५ जणांची चाचणी घेण्यात आली असून त्यातील ११ लाख ६७ हजार ४९६ म्हणजेच २०.५१ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे.
दरम्यान काल दिवसभरात आणखी ४०५ मृतांची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ३१ हजार ७९१ इतका झाला आहे. राज्याचा मृत्यूदर सध्या २.७२ टक्के इतका आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेले रुग्ण अर्थात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३ लाखाचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. सध्या ३ लाख ८८७ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७९ हजार ६९१ रुग्ण असले तरी हा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८० हजारचा टप्पा ओलांडून पुढे गेला होता तो आता ८० हजाराच्या खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईची चिंता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. २० हजारापर्यंत खाली आलेला आकडा आता ३४ हजार २५९ इतका झाला आहे तर शेजारच्या ठाणे जिल्ह्यात हाच आकडा सध्या २९ हजार ९२१ इतका झाला आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात सध्या २१ हजार ७४६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या १७ लाख ७८ हजार व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.