CoronaEffectNewsUpdate : सततच्या लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी बार मालकाने पत्नीसह दोन मुलांची हत्या करून केली आत्महत्या…

सततच्या लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी बार मालकाने पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना सोलापुरातील जुना पुणे नाका हांडे प्लॉट परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार १३ जुलै रोजी सायंकाळी घडली. अमोल अशोक जगताप (वय ३७ ), पत्नी मयुरी अमोल जगताप (वय २७), मुलगा आदित्य अमोल जगताप (वय ०७) आणि आयुष अमोल जगताप (वय ४ , सर्व रा. राजपूत यांच्या घरात भाड्याने, हांडे प्लॉट, जुना पुना नाका सोलापूर ) अशी मृतांची नावे आहेत.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , अमोल जगताप हा जुना पुणे नाका हांडे प्लॉट येथील राजपूत यांच्या घरात भाडयाने राहात होता. त्याची पत्नी मयुरी, आदित्य आणि आयुष असे दोन मुले असा त्यांचा संसार असून तो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळील गॅलक्सी हॉटेल बिअर बार चालवत होता. त्याच्या घरात अचानकपणे दोरीला लटकलेले मृतदेह दिसल्यानंतर शेजारी राहणाऱ्यांनी पोलीसांना ही खबर दिली.
फौजदार चावडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, पोलीस हवालदार आबा थोरात यांच्यासह कर्मचारी हांडे प्लॉट येथे आले आणि त्यांनी जगताप यांच्या घरात पाहणी केली .त्यावेळी अमोल जगताप, दोन मुले हे गळफासाने लटकत होते तर पत्नी मयुरी ही पलंगावर पालथी पडून होती .पोलीसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गायकवाड, सिव्हिल मधील लादेन यांच्या मदतीने मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. त्याच्या घराची तपासणी केली असता एक चिठ्ठी आढळून आली. तर अमोलची पत्नी मयुरी ही पलंगावर पडलेली होती तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. पोलीसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली. सततच्या लॉकडाऊनमुळे अमोलचा व्यवसाय पूर्णतः ठप्प असल्याने तो आर्थिक अडचणीत आला होता असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बांगर यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून या चारजणांच्या मृत्यूबाबत अद्याप काहीच कारण पोलीसांकडून सांगण्यात आले नाही. या घटनेमुळे हांडे प्लॉट जुना पुणे नाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन चिमुकल्यांना आणि त्यांच्या आईला गळफास देऊन त्यांचा खून करीत स्वत: आत्महत्या असे एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.