MaharashtraNewsUpdate : पगार कपातीच्या शक्यतेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

पुढच्या महिन्याचा पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी स्थिती असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः दिल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान कोविड योद्धे व त्यांच्याशी संबंधित विभागातील कर्मचारी वगळता अन्य सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करावी लागेल,’ अशी शक्यता त्यांनी काल पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले , कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. पुढच्या महिन्याचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मदत-पुनर्वसन, आरोग्य व अन्य दोन असे चार विभाग वगळून इतर सर्व विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे,’ असं वडेट्टीवार म्हणाले. ‘करोनाच्या लढाईत आघाडीवर राहून लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कुठलीही कपात केली जाणार नाही,’ अशी ग्वाही देखील त्यांनी केली.