#CoronaEffectUpdate : महाराष्ट्रातील मंदिरांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली हि भूमिका ….

देशात पाचवा लॉकडाऊन सुरु होऊन अनलॉक १ सुरु झाले असले तरी , कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यांनंतर देशभरातील धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला असला तरी राज्य सरकारच्या निर्णयानुसार, राज्यातील मंदिरं ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना ३० जूनपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राज्यभरातील बहुसंख्य जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनचा ३० जूनपर्यंतचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. यामध्ये अनेक गोष्टी शिथिल केल्या आहेत. त्यात रेड झोन आणि कंटेनमेंट झोन सोडून अन्य भागातील सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिरे ८ जूननंतर सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्य सरकारने मंदिरे बंद ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.
दरम्यान देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथमच भाविकांना दर्शनासाठी बंद केले. यामध्ये चैत्री यात्रा, गुढी पाडवा, अक्षय तृतीया, रामनवमी यासह महिन्याची एकादशी, असे अनेक उत्सव रद्द करून साध्या पध्दतीने साजरे केले आहेत. सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विठुभक्तांना आता देवाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. परंतु कोरोनामुळे बंद झालेले विठु माऊलीचे दर्शन कधी मिळेल, अशी आस वारकऱ्यांना लागली असली तरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० जूनपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.