MaharashtraUpdate : शाब्बास : लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी दंडापोटी वसूल केले पावणे सहा लाख : गृहमंत्री

गेल्या दोन महिन्यात राज्यातील नागरिक लॉकडाऊनमध्ये असताना या ना त्या कारणावरून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंडापोटी ५ कोटी ७५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच ७५ हजार वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या शिवाय लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात १ लाख १६ हजार गुन्हे नोंदवण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात २२ मार्च ते २७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,१६,६७० गुन्हे नोंदवण्यात आले असून २३,३१४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ७५ लाख ३० हजार २६७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करत असून अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या असून याप्रकरणी ८३३ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी दिली आहे.
करोनाच्या संशयामुळे ज्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्का मारला होता असे ७०६ लोक या दोन महिन्यात विलगीकरण कक्षातून पळून गेले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात ठेवले आहे. लॉकडाऊनच्या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७५,८१३ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २१ पोलीस आणि एक अधिकारी अशा २२ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे, असं सांगतानाच पोलिसांना जर करोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षात जाऊन तात्काळ उपचार घेण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.