#CoronaVirusUpdate : कोरोनाविषयी स्वच्छता राखा , राज्यात अंडी, कोंबडी, मटण, मासळीला बंदी नाही : अजित पवार

कोरोना व्हायरसविषयी कोणताही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याच्या अटीवर जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘करोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
दरम्यान राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही ‘करोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळं होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असंही पवार यांनी सांगितलं.
राज्यात कोरोना सुरु असला तरी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायोमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा करोना प्रतिबंधासाठी व्यग्र असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी केला.