#CoronaVirusEffect : आज रात्री १२ नंतर मुंबईतील लोकल ३१ मार्चपर्यंत पूर्णतः बंद

देशातील आणि राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने गर्दी रोखण्यासाठी अखेर रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गांवरील लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यू असल्याने आज मुंबईतील लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. केवळ ६० टक्केच लोकल आज धावत आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंतच असेल. रात्री १२ नंतर लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल. ३१ मार्चपर्यंत ही सेवा स्थगित राहील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मुंबईप्रमाणे कोलकातामधील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे.
दिवसभरात लोकलच्या किमान ३ हजार फेऱ्या होतात. अर्थात लोकल हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी लोकल बंद करणे हे शेवटचे पाऊल होते. त्याबाबत गेले काही दिवस चाचपणीही सुरू होती. कालच कोकण विभागीय आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णयही जाहीर केला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी-अधिकारी तसेच तातडीचे उपचार आवश्यक असणारी व्यक्ती सोडून कोणालाही रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, असे शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले होते. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या निर्णयानंतर आता मुंबईतील लोकलसेवाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लोकलला खऱ्या अर्थाने ब्रेक लागणार आहे.