“चला हवा येऊ द्या” कार्यक्रमातील वादाविषयी निलेश साबळे यांची अखेर माफी

झी मराठी वाहिनीवर ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमांमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तींनी यावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजी राजे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन “लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो,” अशी टीका करत झी मराठी आणि निलेश साबळेने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती.
या कार्यक्रमाचे सदारकर्ते निलेश साबळेने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ टाकला आहे. सादर करण्यात आलेला स्किटमधला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचं निलेश साबळेने म्हटलंय.
दरम्यान आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी तीव्र भावना संभाजीराजेंनी व्यक्त केली होती.