Aurangabad : दिल्लीतील ‘जेएनयू’ हिंसाचाराचे पडसाद , राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचा भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

दिल्लीतील जेएनयू हिंसाचाराच्या विरोधात देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून . मुंबई पाठोपाठ राज्यातल्या इतर शहरांमध्येही आता विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेनं आज आक्रमक आंदोलन केलं. रविवारी जेएनयूमध्ये विद्यार्थ्याच्या एका गटाने लोखंडी रॉड आणि सळ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या हिंसाचारावरून डाव्या विद्यार्थी संघटना आणि भाजपची संबंधीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. रविवारी जेएनयू मध्ये वातावरण तापलं होतं. त्या घटनेचा विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निषेध केलाय.
औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने भाजपच्या शहर कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. २५ ते ३० कार्यकर्ते भाजपच्या ऑफिसजवळ आले होते. अतिशय आक्रमक घोषणाबाजी करत ते ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयात उपस्थित असल्याने हल्ल्याचा प्रयत्न उधळला गेला असा दावा भाजपने केला आहे.
याच प्रकरणावरून नाशिकमध्येही राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतरअभाविपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.