Aurangabad Crime : पन्नास हजारांच्या खंडणीसाठी मावशी-भाचीचे अपहरण, मध्य प्रदेशातून पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
पोलिसांची कसून चौकशी सुरू
पन्नास हजारांच्या खंडणीसाठी मावशी आणि भाचीचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास समोर आला. याप्रकरणी हर्सुल पोलिसांनी मध्य प्रदेशातून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू असून, बुधवारी सकाळपर्यंत पोलिसांचे पथक शहरात दाखल होणार आहे. मात्र, पोलिसांनी त्यांची नावे देण्यास नकार दिला.
हर्सुल परिसरात विटभट्टीवर काम करुन उदरनिर्वाह करत असलेल्या मजूराची मुलगी व मेव्हणी इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या कामासाठी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नाशिकला गेल्या. त्यानंतर जाधव (नाव बदलले आहे) कुटुंबिय त्यांच्या नेहमी संपर्कात होते. मात्र, २४ नोव्हेंबरपासून दोघींचे मोबाईल अचानक बंद येऊ लागले. त्यामुळे दोघी कामात असतील असा विचार करुन जाधव कुटुंबियांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक जाधव यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एकाने संपर्क साधला.
यावेळी समोरुन त्यांची मुलगी बोलत होती. तेव्हा तिने सांगितले की, आपल्याला काही जणांनी पकडून ठेवले आहे. ते पन्नास हजारांची मागणी करत आहेत. तेव्हा तुम्ही गाडी विकून त्यांना पैसे द्या. यानंतर लगेचच त्या व्यक्तिने जाधव यांच्या मेव्हणीला बोलण्यास सांगितले. तिने देखील यावेळी पन्नास हजार रुपयांची मागणी करत असल्याचे म्हणाली. तिच्याशी बोलणे झाल्यावर समोरील व्यक्तिने आपल्याला दोघींना ७० हजारात विकण्यात आले आहे. आता या दोघींना घेऊन जायचे असेल तर आम्हाला त्यामोबदल्यात पन्नास हजार रुपये दयावे लागतील. त्यानंतरच या दोघींना सोडण्यात येईल. तुम्ही ही रक्कम गुगल फोनवर ट्रान्सफर करा अशीही धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या जाधव कुटुंबियांनी सोमवारी तात्काळ हर्सुल पोलिस ठाणे गाठले. दोघींचे अपहरण करुन खंडणी मागितली जात असल्याची तक्रार हर्सुल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
याप्रकरणाचा तपास करत असताना सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे व त्यांच्या पथकाने माग काढत मध्यप्रदेश गाठले. तेथून दोघींना ताब्यात घेत तिघांच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी सकाळपर्यंत कामे व त्यांचे सहकारी शहरात दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.