‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ : अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी वगळा अन्यथा परिणामांना सामोरे जा , जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल.#TanhajiTrailer @omraut— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 20, 2019
संभाजी ब्रिगेडने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृष्यांवर तसेच संवादांवर आक्षेप नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांमध्ये बदल करण्याची मागणी एका ट्विटद्वारे केली आहे. ट्रेलरमधील वादग्रस्त दृष्य व संवाद वेळीच वगळा अन्यथा परिणामांना सामोरे जा, हे केवळ ट्विट नसून थेट धमकीच समजा असा इशारा या ट्विटमध्ये दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, ओम राऊत तुमच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल, असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर याला धमकी समजली तरी चालेल, असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड या संघटनेने ट्रेलरबाबत आपला आक्षेप नोंदवला होता. छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण आहे, अभिनेञी काजोलच्या तोंडी असलेले संवाद आणि महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर दाखवण्यात आलेल्या ॐ ला ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.
या सर्व गोष्टींबाबत निर्माता अजय देवगन व दिग्दर्शक ओम राऊत यांनी खुलासा करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने केली आहे. दरम्यान, मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळेस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं आधीच स्पष्ट केलं होतं. “चित्रपटातील सर्व संदर्भ ऐतिहासिक असून यावर आम्ही बराच अभ्यास केला आहे. कोणाच्याही भावना दुखवाल्या जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे,” असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजय देवगणने स्पष्ट केले होते.