Aurangabad Crime : सहप्रवासी महिलेचे पन्नास हजार लांबविणारी चौकडी जेरबंद, भाचींच्या मदतीला मावशी ; रिक्षाचालकासह चौघे अटक

आपसात केले होते पैशांचे वाटप…
रिक्षाचालकाला सोबत घेऊन भाचीच्या मदतीने सहप्रवासी महिलांच्या पर्समधील दागिने आणि रोकड लांबविणारी चौकडी मुकुंदवाडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. विशेष म्हणजे मावशी व भाच्या धुळे, चाळीसगावहून शहरात येऊन चोरी करायच्या. त्यानंतर आपसात वाटाघाटी करुन पुन्हा मुळगावी निघून जात होत्या. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले होते. मात्र, नुकतेच सहप्रवासी महिलेचे पन्नास हजार रुपये लांबविल्यानंतर रिक्षाचा क्रमांक सीसीटिव्हीत कैद झाला. त्यावरुन पोलिसांनी या चौकडीचा अवघ्या २४ तासात शोध घेतला.
मुलाच्या शिक्षणासाठी मालेगावकडून पन्नास हजार रुपये आणल्यानंतर नाशिकच्या बसने कल्पना विजयचंद जैन (६०, रा. एसटी कॉलनी, प्लॉट क्र. २, एन-२, सिडको) या ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप चौकात उतरल्या होत्या. तेथून सिडकोत जायचे असल्याने त्या बाबा पेट्रोल पंप चौकात असलेल्या अब्दुल लतीफ शेख इब्राहिम (२८, रा. लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, शिवाजीनगर रोड) याच्या रिक्षात (एमएच-२०-डीसी-२९१२) बसल्या. तत्पुर्वी या रिक्षात आशाबाई नारायण उमप उर्फ उनपे (५०, रा. नारायणवाडी, पाण्याच्या टाकीजवळ, झोपडपट्टी, चाळीसगाव) तिच्या भाच्या शितल गोकुळ कसबे उर्फ कासोदे (३०, रा. पंचवटी, देवपुर, धुळे) आणि अनिता विजय ससाणे (२६, रा. हरि विठ्ठलनगर रोड, राजीव गांधीनगर, जळगाव) या रिक्षात बसलेल्या होत्या.
चिकलठाण्याच्या दिशेने रिक्षा जात असताना या तिघींनी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचवेळी एकीने त्यांच्या पर्समधील पन्नास हजारांची रोकड अलगद काढून घेतली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास जैन या रिक्षातून खाली उतरल्या. तर रिक्षा चिकलठाण्याच्या दिशेने निघून गेली. त्यानंतर जैन यांनी पर्स तपासली. तेव्हा त्यातील पन्नास हजारांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरुन त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी मुकुंदवाडी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हींची तपासणी केली. त्यात रिक्षाचा क्रमांक पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यावरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, सहायक फौजदार कौतिक गोरे, जमादार रवि शिरसाठ, शिपाई शेख असलम, कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सुनील पवार, मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील यांनी रिक्षाचालक अब्दुल लतीफ याचा शोध घेतला. त्याला पकडल्यानंतर त्याने गुन्ह््याची कबुली देत या तिन्ही महिलांची नावे सांगितली.