बारामती : गाय व बैलांची कत्तल करणारांना अटकपूर्व जमीन नाही

गाई व बैलांची कत्तल करत असल्याच्या आरोपांप्रकरणी बारामती पोलिसांनी गुन्हा नोंदवलेल्या सलिमा समद कुरेशी व समद बकास कुरेशी यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व अर्ज नुकताच फेटाळून लावला. पुणे जिल्ह्यातील बारामती शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गाई व म्हशींची कत्तल केली जात असल्याची माहिती ३ सप्टेंबरला मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला होता.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, ‘छाप्याच्या वेळी आसिफ कुरेशी नावाचा माणूस तिथे उपस्थित होता. कत्तल केलेल्या गाई व बैलांचे मांस येथे विकण्यात येत असून गाईंचा गोठा जवळच असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. हा गोठा सलिमा व समद यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले आणि पत्र्याच्या शेडमध्ये मांस व प्राण्यांची कातडी आढळली. त्यामुळे दोघा मालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.’
दोघा आरोपींचे अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याविषयी न्या. सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी झाली असता, गाई व बैलांच्या कत्तलीचा आरोप खोटा असून कोणताही गुन्हा केला नसल्याचा दावा आरोपींनी अॅड. रणजीत पवार यांच्यामार्फत केला, तर पोलिसांकडे पुरावे असल्याचा दावा करत अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत जाधव यांनी आरोपींच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. अखेरीस ‘हा अजामीनपात्र गुन्हा असून एफआयआरमधील बाबी पाहता अटकेपासून संरक्षण देता येणार नाही’, असे स्पष्ट करत न्यायमूर्तींनी आरोपींचा अर्ज फेटाळून लावला.