खा. अमोल कोल्हे यांच्यानंतर राजू शेट्टी यांच्याकडूनही उदयनराजेंची मनधरणी

राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेतली होती. दरम्यान स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली आहे.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलली जाऊ शकतात. त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. म्हणूनच राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेतली.
‘विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना विनंती केली आहे. त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही,’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजे आता नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.
राष्ट्रवादीसाठी उदयनराजेंचं पक्षात राहणं फायद्याचं आहे. मात्र ही गरज एकतर्फी नसल्याचं साताऱ्यातील स्थानिक राजकारणातून यापूर्वीच दिसून आलं आहे. कारण उदयनराजेंसारख्या दिग्गज नेत्यालाही याआधी निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे स्वत:च्या करिष्म्यासोबत पक्षाची संघटनात्मक ताकद मागे उभी असणं उदयनराजेंसाठी गरजेचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारमंथन करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीतही उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हानांची जाणीव करून दिली होती. ‘या निवडणुकीत माझं मताधिक्य घटलं आहे. एकप्रकारे हा पराभवच आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेताना घाई नको,’ असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडणं उदयनराजेंसाठी तितकंच सोपं नसल्याचं दिसत आहे.